जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापार मार्गांपैकी एक असलेल्या हार्मूझ खाडीला बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेमध्ये मंजूर झाला आहे. अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते खामेनी घेणार आहेत. हा निर्णय घेतला जाण्याची पार्श्वभूमी म्हणजे अमेरिकेने इराणमधील तीन आण्विक ठिकाणांवर केलेले हवाई हल्ले. त्यामुळे भारतासह आशियाई देशांवर तेलाच्या तुटवड्याचे संकट.
या खाडीच्या माध्यमातून जगाच्या एकूण तेल पुरवठ्याच्या सुमारे 20% तेल आणि गॅसची वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा मार्ग बंद झाला, तर भारत, चीन आणि पाकिस्तान यांसारख्या देशांवर मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
इराण आणि इझ्रायल यांच्यातील संघर्षामुळे केवळ एका आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या आहेत. तणाव वाढत राहिल्यास या किमती 120 डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात.
भारतासारख्या देशासाठी हा धोका अधिक गंभीर आहे. कारण भारत आपले सुमारे 88% तेल परदेशातून आयात करतो, यातील सुमारे 60% तेल हार्मूझ खाडी मार्गे भारतात येते. याशिवाय, भारताला लागणाऱ्या 50 LNG (द्रव नैसर्गिक वायू) जहाजं देखील याच मार्गाने येतात.
या परिस्थितीचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. यामुळे व्यापार तूट वाढू शकते आणि भारतीय रुपयाच्या मूल्यात घट येण्याचा धोका निर्माण झाला आहे.